News Update :

सोनिया रडल्या हो, पण कोणासाठी?

Sunday, February 12, 2012


बाटला हाऊसच्या चकमकीत मारल्या गेलेल्या अतिरेक्यांसाठी सोनिया गांधी रडल्या. बाईसाहेबांचे हे अश्रू इतर वेळी का सुकून जातात? 
सोनिया रडल्या हो,
पण कोणासाठी?
कॉंग्रेस पक्षाच्या इटालियन सम्राज्ञी सोनिया गांधी यांचेही मन द्रवते व त्यांनाही रडू येते असा गौप्यस्फोट केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शींद यांनी केला आहे. अर्थात हे अश्रू देशातील गोरगरीब जनता, गरिबी, महागाईने होरपळलेल्या जनतेसाठी नसून फक्त मुसलमानी लांगूलचालनासाठी आहेत. कारण सोनिया बाईंच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या त्या बाटला हाऊसमधील पोलीस चकमकीत मारल्या गेलेल्या धर्मांध अतिरेक्यांसाठी. सलमान खुर्शीद यांनी असे जाहीर केले आहे की, ‘बाटला हाऊस’ चकमकीची हृदयद्रावक छायाचित्रे पाहून कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना अक्षरश: रडूच कोसळले होते. प्रश्‍न इतकाच आहे की, अतिरेक्यांच्या मृतदेहाची छायाचित्रे पाहून सोनिया बाईंनी इतके भावुक होण्याचे व रडण्याचे कारण काय? २००८ मध्ये दिल्लीतील जामियानगरमध्ये असलेल्या बाटला हाऊसमध्ये दिल्ली पोलिसांनी इंडियन मुजाहिद्दीनच्या अतीफ अमीन आणि मोहंमद साजीद या अतिरेक्यांचे एन्काऊंटर केले होते. दोन अतिरेक्यांना त्यावेळी अटक झाली तर एक अतिरेकी पळून गेला. बाटला हाऊस चकमक ही पोलिसांनी राष्ट्रद्रोही धर्मांध शक्तींविरुद्ध पुकारलेले युद्ध होते व प्राणाची बाजी लावून पोलिसांनी बाटला हाऊसमध्ये धडक मारली. बाटला हाऊसची चकमक बनावट नव्हती तर खरीच होती व हजारो लोकांच्या साक्षीने ही चकमक सुरू होती. ‘बाटला हाऊस’मध्ये दडलेल्या इंडियन मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालणार्‍या दिल्ली पोलिसांना शाबासकी देण्याचे काम तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग व गृहमंत्री चिदंबरम यांनी केले होते. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी हे एन्काऊंटर महत्त्वाचे होते अशी कबुली खुद्द पंतप्रधानांनी दिली. मात्र आता या चकमकीचा वापर उत्तर प्रदेश निवडणुकीत मुस्लिम मतांसाठी कॉंग्रेसकडून केला जात आहे. कॉंग्रेस पक्ष हा मुडद्यांच्या टाळूवरचे लोणी चाटणारा पक्ष आहे हे माहीत होते, पण देशद्रोह्यांच्या, 
अतिरेक्यांच्या मुडद्यांवरील ‘भेजा फ्राय’ही यांना चालतो हे सलमान खुर्शीद यांनी उघड केले आहे. संसदेवर हल्ला करून सहा सुरक्षा रक्षकांना मारणार्‍या अफझल गुरूची फाशी अद्याप का लटकली? याचाच खुलासा सलमान खुर्शीद यांच्या गौप्यस्फोटाने झाला. कारण अफझल गुरू, कसाबसारख्यांना फासावर लटकवले तर सोनिया बाईंना रडू कोसळेल व कॉंग्रेस पक्ष दु:खसागरात बुडून जाईल. सोनिया बाईंचे मन असे हळवे असल्यावर दुसरे काय व्हायचे? बाटला हाऊसच्या चकमकीत मारल्या गेलेल्या अतिरेक्यांसाठी सोनिया गांधी रडल्या. बाईसाहेबांचे हे अश्रू इतर वेळी का सुकून जातात? संसदेवरील हल्ल्यात सहा सुरक्षा रक्षक लढताना शहीद झाले. त्या हुतात्म्यांचे फोटो पाहून सोनिया गांधी कधी रडल्याची अफवाही पसरलेली नाही. असेल तर सलमान खुर्शीद यांनी तसे जाहीर करावे. दिल्लीत दहशतवाद्यांनी अनेकदा बॉम्बस्फोट घडवून असंख्य निरपराध्यांचे प्राण घेतले. त्यात मेलेल्यांचे छिन्नविच्छिन्न मृतदेह रस्त्यावर पडल्याची छायाचित्रे वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली. अगदी अलीकडेच दिल्ली हायकोर्टाच्या आवारात अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून पंचवीस निरपराध्यांचे बळी घेतले. त्या निरपराध्यांची छायाचित्रे पाहून सोनियांच्या अश्रूंनी वृत्तपत्र चिंब भिजले अशी माहिती अद्याप तरी कुण्या कॉंग्रेसवाल्याने समोर आणलेली नाही. पुण्याच्या जर्मन बेकरीवर हल्ला झाला. त्यातही माणसे मेलीच, पण सोनिया किंवा त्यांच्या खानदानास हुंदका फुटला काय? मुंबईत तर वर्षानुवर्षे हल्ल्यांवर हल्ले आणि स्फोटांवर स्फोट घडविले जात आहेत. ‘२६/११’च्या मुंबईवरील हल्ल्यातील तुकाराम ओंबळे, विजय साळसकर, अशोक कामटे, हेमंत करकरे व इतर सर्व शहीद पोलिसांच्या छायाचित्रांकडे पाहून सोनिया गांधी खुदकन हसल्या होत्या काय? कारण पोलीस चकमकीत मारल्या गेलेल्या अतिरेक्यांसाठी त्या अश्रू गाळीत असतील तर देशासाठी शहीद होणार्‍या पोलिसांसाठी बाईसाहेब नक्कीच हसत असल्या पाहिजेत. कारण शेवटी हा देशच त्यांचा नसल्यामुळे त्यांची देशभावना, राष्ट्रभावना उचंबळून येण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. इटली हे सोनियांचे जन्मस्थान आहे. माफियांच्या मृतदेहांवर शोक व्यक्त करण्याची तेथील परंपरा आहे. बाटला हाऊसमधील मारल्या गेलेल्या अतिरेक्यांच्या मृतदेहांवर अश्रूंचा अभिषेक करून सोनिया गांधी यांनी मायदेशाच्या परंपरेचे जतन केले. राष्ट्रद्रोही अतिरेक्यांच्या मुडद्यांवर अश्रू आणि फुले उधळण्याची संस्कृती आमच्या देशाची तरी नाही. 
मतांसाठी राष्ट्रद्रोह्यांना हौतात्म्य देण्याचा प्रकार निर्लज्जपणाचा आहे व असे करणारेही राष्ट्रद्रोहीच आहेत. उत्तर प्रदेशातील मुसलमानी मतांसाठी कॉंग्रेस पक्षाने जो अतिरेकी मार्ग स्वीकारला त्यामुळेच देशातील धर्मांध व पाकिस्तानवाद्यांना बळ मिळत आहे. कश्मीर खोर्‍यात गेल्या काही वर्षांत लाखो हिंदू पंडितांची अमानुष कत्तल झाली. हिंदूंची पंचविसेक हजार मंदिरे पाकड्या अतिरेक्यांनी उद्ध्वस्त केली. कश्मिरी पंडित घरेदारे, जमीनजुमला टाकून पळाले व निर्वासितांच्या छावण्यांत राहू लागले. त्यांचे जीवन नरकयातनांपेक्षा कमी नाही. त्या हिंदू पंडितांच्या यातना पाहून - ऐकून सोनिया गांधींनी अश्रूंचे दोन टिपूस तरी कधी गाळलेत काय? तो राहुल, ती प्रियांका व तिचा दिवटा नवरा रॉबर्ट ज्या प्रकारे उत्तर प्रदेशात फिरत आहेत व खासकरून मुस्लिम मतांसाठी लांगूलचालन करीत आहेत तो सर्वच प्रकार नरकयातना भोगणार्‍या कश्मिरी पंडितांसाठी पीडादायक आहे. कश्मिरी पंडितांच्या निर्वासित छावण्यांमध्ये ना कधी प्रियांका वढेरा गेली ना युवराज राहुल. सोनियांकडे तर त्यांच्यासाठी अश्रूही नाहीत व हुंदकेही नाहीत. कॉंग्रेस हा मुस्लिम बांधवांच्या मृतदेहांवर स्वत:चे राजकारण करणारा पक्ष आहे. सोनिया गांधी नाटकी असून त्यांचे अश्रू मगरीचे अश्रू असल्याची टीका समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी केली आहे. मुसलमानी लांगूलचालनाच्या बाबतीत सोनियांची कॉंग्रेस काय किंवा मुलायमसिंगांची समाजवादी पार्टी काय, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मुसलमान हे या देशाचेच नागरिक आहेत व राष्ट्रभक्त मुसलमानांनी अनेकदा या देशासाठी कुर्बानी दिली आहे, पण देशाच्या मुळावर येणारा पाकड्या निष्ठेचा मुसलमान असो नाहीतर हिंदू असो, त्यांना ना दयामाया दाखवायला हवी ना त्यांच्यासाठी अश्रू, हुंदके आणि भावनेचे उसासे टाकायला हवेत. बाटला हाऊस चकमकीत मारले गेलेले दोन अतिरेकी जणू कॉंग्रेसने शहीदच ठरवले. दिल्लीच्या इंडिया गेटवर त्या दोन अतिरेक्यांचे स्मारक, त्याच्या बाजूला अफझल गुरूचे स्मृती दालन उभारण्याची घोषणाही उद्या हे सलमान खुर्शीद करू शकतात. सोनिया गांधींनी देशद्रोह्यांसाठी अश्रू गाळले म्हटल्यावर सलमान खुर्शीदना हे एवढे करावेच लागेल. 
Share this Article on :
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
 

© Copyright संपादकीय अग्रलेख 2010 -2011 | Design by Herdiansyah Hamzah | Published by Borneo Templates | Powered by Blogger.com.