News Update :

पोलीस कुणाचे रक्षक

Sunday, February 26, 2012


राजधानी दिल्लीतले पोलीस सर्वसामान्य जनतेचे, गोरगरीब जनतेचे नव्हे तर ते गुंड-मवाल्यांच्या टोळ्यांचे, गुन्हेगारांचेच रक्षक असल्याच्या समजावर अलीकडच्याच घटनेने शिक्कामोर्तब झाले. राजधानीतल्या फ्रेंड्‌स कॉलनी विभागातल्या हॉटेल सूर्या या पंचतारांकित हॉटेलच्या बाहेरच्या रस्त्यावर पंधरा दिवसांपूर्वी भरदिवसा, बारा गुंडांच्या टोळीने एका युवकाला मोटारीतून खेचून बाहेर काढले. त्यांनी लाठ्या/काठ्या आणि लोखंडी गजांनी त्याला बेदम मारहाण केली. लाथाबुक्क्या घातल्या. गुंडांचा हा हैदोस पंचवीस मिनिटे सुरु होता. त्याला सोडवायसाठी-वाचवायसाठी गेलेल्या   चार लोकांनाही या गुंडांनी अमानुष मारहाण केली. परिसरातल्या मोटारींची तोडफोड करून ही गुंडांची टोळी राजरोसपणे पसारही झाली. विशेष म्हणजे ही मारहाण सुरु असताना अवघ्या हजार फुटांवर असलेल्या पोलीस ठाण्यात कळवूनही, पोलीस घटनास्थळी फिरकले नाहीत. मारहाण करणाऱ्यांना पकडण्याच्या ऐवजी पोलिसांची गस्त घालणारी मोटार शेजारून निघूनही गेली. जखमींना दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्यावरही पोलीस लवकर फिरकले नाहीत. या सशस्त्र टोळक्याने चोपून काढल्याने अर्धमेल्या झालेल्या भूपेंद्रने आपल्याला मारहाण करणाऱ्या गुंडांची नावेही पोलिसांना सांगितली होती. 13 फेब्रुवारीला भरदिवसा मारहाण करून दहशत निर्माण करणाऱ्या, युवकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या या टोळीचा दिल्ली पोलिसांनी 14 दिवस शोधही घेतला नाही. हॉटेल सूर्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात गुंडांनी केलेल्या मारहाणीची चित्रफितही अवघ्या दोन तासात पोलिसांना दिली होती. पण, पोलिसांनी काहीही केले नाही. वृत्तपत्रे आणि उपग्रह वृत्तवाहिन्यात पोलिसांच्या या गुंडांना पाठीशी घालायच्या, संरक्षण द्यायच्या कृत्याचा पंचनामा झाला तेव्हाच, अवघ्या बारा तासात या गुन्ह्यातल्या गुंडांना अटक झाली. तब्बल तेरा दिवस गुंडांची ही टोळी राजधानी दिल्लीत राजरोसपणे फिरत होती. घटना घडल्यावर संशयित गुन्हेगार पळून गेले, लपून बसले, त्यांना आम्ही शोधून काढले. अशी बढाई या विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय चौधरी यांनी मारली असली तरी, पोलीस कुणाचे रक्षक आहेत, हे दिल्लीकरांना माहिती असल्यामुळे, त्यांची प्रशंसा कुणीही करणार नाही. जखमी झालेला भूपेंद्र आणि त्याला बेदम मारहाण करणारा गुंडांच्या टोळीचा नायक रॉकी यांच्यात प्रेम प्रसंगावरून झालेल्या भांडणातूनच, मारहाणीची ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितल्याने, या घटनेचे गांभीर्य काही कमी होत नाही. पोलिसांनीच गुंडांना मोकाट सोडले, ही बाब राजधानी दिल्लीच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभी करणारी ठरते. चित्रफीत मिळूनही पोलिसांनी काहीही कारवाई का केली नाही? भरदिवसा आणि तेही पोलीस ठाण्याच्या जवळच गुंडांच्या टोळ्या असा हैदोस घालत असतील, तर पोलिसांची जरब गुंड-मवाल्यांवर राहणार तरी कशी? राजधानी दिल्लीतल्या गुन्हेगारांना पोलिसांची कसलीही-काहीही भीती वाटत नसल्यानेच गुंडांना अडवणाऱ्या पोलिसांवरही दगडफेकीच्या घटना घडतात. पोलिसांनाही गुंड चोपून काढतात. पोलीस खात्याच्या अब्रूची लक्तरे वारंवार वेशीवर टांगली गेली, त्यांची छी-थू झाली, तरीही निर्ढावलेल्या-निगरगट्ट पोलीस खात्यावर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही, हेच या घटनेने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.
राजधानी असुरक्षितच 
फ्रेंड्‌स कॉलनीतल्या या भयंकर घटनेला प्रसारमाध्यमांनी वाचा फोडली नसती तर, पोलिसांनी या गुंडांना अटक करून कारवाई केली असती, यावर दिल्लीकरांचा मुळीच विश्वास बसणार नाही. गेल्या पाच वर्षांत दिल्लीतल्या गुन्हेगांरावर जरब निर्माण करण्यात पोलीस खाते पूर्णपणे अपयशी ठरले. धावत्या मोटारीत युवतीवर बलात्कार, विद्यापीठांच्या परिसरातल्या बलात्काराच्या वाढत्या घटना, सामूहिक बलात्कार, गुंडांच्या टोळ्यांनी घरात घुसून मारहाण करायच्या वाढत्या घटना, भररस्त्यात महिलांची छेडछाड, चोऱ्या, दरोडे हे गुन्हे कमी झालेले नाहीत. अनेक गुन्ह्यांचा तपासही दिल्लीतल्या पोलिसांना लावता आलेला नाही. भरदिवसाही महिलांना सुरक्षितपणे फिरणे अवघड झाले आहे. मोटारसायकलवरून गुंडांच्या टोळ्या भरधाव वेगाने रस्त्यावरून जातात. वाटेत महिलांच्या गळ्यातले सोन्याचे दागिने हिसकावून पळून जातात. काही वेळा महिलांना धमकावून त्यांची लूट होते. उपनगरांच्या भागात दरोडे पडतात. झोपडपट्ट्यात काळ्या धंद्यांना आलेला ऊत, गुंडांची दहशत यामुळे गरीबांनाही जगणे अवघड झाले आहे. राजधानी दिल्लीत दररोज बलात्काराचा एक गुन्हा घडतो. दरवर्षी चोऱ्या, दरोडे, खून, हाणामाऱ्या असे पन्नास हजारांच्यावर गुन्हे घडतात. दिल्ली विधानसभेतही राजधानीतल्या वाढत्या गुन्हेगारीबद्दल कडाक्याची चर्चा झाली. विरोधकांनी मुख्यमंत्री शीला दीक्षित सरकारवर टीकेची झोड उठवली. पण, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. केंद्रीय गृहमंत्र्यालयाचेही नियंत्रण असलेल्या या पोलीस खात्यावर सरकारची जरब राहिलेली नाही. भुरट्या चोऱ्या, हाणामाऱ्या दिवसाढवळ्या होतात. गुंडांना पोलिसांची भीती वाटत नाही. कायदा आणि सुव्यवस्थेच्या रक्षणाची जबाबदारी असलेले दिल्लीचे पोलीस गुंडांना मोकाट सोडतात आणि सामान्य जनतेचा छळ करत असल्याने, या खात्यावर सामान्य जनतेचा विश्वास राहिलेला नाही. गुंडांच्या टोळ्या आणि काही पोलिसांचे-अधिकाऱ्यांचे लागेबांधे असावेत, या संशयाला या घटनेने बळकटी येते. पोलीस ठाण्यात दाद मागायसाठी जाणाऱ्या सामान्य नागरिकांना अवमानास्पद वागणूक देणारे हे मग्रूर पोलीस गुंडांसमोर मात्र मुजरे ठोकतात, अशी दिल्लीकरांची सार्वत्रिक तक्रार आहे. संसदेच्या गजबजलेल्या कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या, कॅनॉट प्लेस, राजपथ परिसरातही दिवसाढवळ्या चोऱ्या होतात, याची शरम केंद्र सरकारलाही वाटत नाही. सामान्य जनतेला सुरक्षा देण्यात अपयशी ठरलेले हेच पोलीस खाते योगगुरु बाबा रामदेव यांच्या शिबिरावर मात्र मध्यरात्रीच्या अंधारात हल्ला चढवते. झोपलेल्या कार्यकर्त्यांना झोडपून काढते. त्यांच्या या विकृतीवर सर्वोच्च न्यायालयानेच अलिकडेच ताशेरे मारले. बाबा रामदेव यांचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन मोडून काढायसाठी क्रौर्याचा कळस गाठत, कार्यकर्त्यांवर केलेल्या अत्याचाराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांवर कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे. 4 जून 2011 ला अंधाऱ्या रात्री रामलीला मैदानावर नि:शस्त्र आणि झोपलेल्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करणाऱ्या संबंधित पोलीस-अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करायचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश, म्हणजे खाकी वर्दीतल्या पिसाळलेल्या दिल्ली पोलीस आणि सरकारच्याही अब्रूचे धिंडवडे काढणारा आहे. केंद्र सरकारने या माजलेल्या पोलीस खात्यावर जरब बसवली नाही तर, दिल्लीच्या सुरक्षा व्यवस्थेचे आणखी तीन-तेरा वाजतील, हेच या घटनेने सिध्द झाले आहे.
Share this Article on :
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
 

© Copyright संपादकीय अग्रलेख 2010 -2011 | Design by Herdiansyah Hamzah | Published by Borneo Templates | Powered by Blogger.com.