News Update :

कॉंग्रेसचे ‘थैली बॉम्ब’

Tuesday, February 14, 2012


थैलीचे राजकारण हीच कॉंग्रेसवाल्यांची परंपरा.
त्याच परंपरेचे विकृत दर्शन अमरावतीत घडले.

कॉंग्रेसचे ‘थैली बॉम्ब’पाच राज्यांच्या विधानसभा आणि महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांत स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासन देण्याचा दावा कॉंग्रेस पक्ष करीत आहे. मात्र अमरावतीमध्ये झालेल्या ‘थैली बॉम्ब’च्या धमाक्याने कॉंग्रेसचे बिंग साफ फुटले आहे. मुंबईसह महाराष्ट्रात अतिरेक्यांनी पेरलेले बॉम्ब अनेकदा फुटत असतात. त्यामुळे कॉंग्रेसचे थोबाड कधीही विचलित होत नाही. पण महानगरपालिका निवडणुकीत पैशांचा खेळ रंगेहाथ पकडल्याने कॉंग्रेसवाल्यांची थोबाडे पाहण्यासारखी झाली आहेत. कॉंग्रेसचा ‘थैली बॉम्ब’ अमरावतीत फुटला. त्या धमाक्याने स्वच्छ राजकारण, नीतिमान कारभार देण्याच्या वल्गनांचे धिंडवडे निघाले. अमरावतीत ‘नाकाबंदी’वर असलेल्या पोलिसांनी एका गाडीतून एक कोटी रुपयांची रोकड जप्त केली. हा थैली बॉम्ब कॉंग्रेस पक्षाने निर्माण केला होता व अमरावतीच्या निवडणुका जिंकण्याकरिता पेरण्यासाठी रवाना केला होता, पण बॉम्ब अमरावतीत पेरण्याआधीच फुटला. कॉंग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय त्यांच्यासाठी निवडणुका म्हणजे फक्त पैशांचा खेळ व सत्तेची मस्ती. हीच त्यांची परंपरा आहे. मतदारांच्या दुर्बलतेचा, असहाय्यतेचा फायदा घ्यायचा, मताला माणसी भाव लावून वाड्या, वस्त्या, झोपडपट्ट्या घाऊक भावाने विकत घ्यायच्या व निवडणुका जिंकायच्या. थैलीचे राजकारण हीच कॉंग्रेसवाल्यांची परंपरा. त्याच परंपरेचे विकृत दर्शन अमरावतीत घडले. असे थैली बॉम्ब प्रत्येक निवडणुकीत कॉंग्रेसतर्फे ठिकठिकाणी पेरले जातात. बहुतेक वेळेस ते फुटत नाहीत. त्यातील पैसा बिनबोभाटपणे वाटला जातो. अमरावतीत मात्र कॉंग्रेसचा एक कोटींचा थैली बॉम्ब फुटला आणि त्या पक्षाच्या पारदर्शकतेचा फुगाही फुटला. तरीही या कॉंग्रेसवाल्यांचे ‘मी नाही त्यातली...’चे तुणतुणे सुरूच आहे. काय तर म्हणे पोलिसांनी जप्त केलेली रक्कम पक्ष निधीची आहे. स्थानिक कॉंग्रेस आमदारांनी तसे पत्रच पोलिसांना दिले आहे. ‘चोर तो चोर वर शिरजोर’ म्हणा किंवा 
चोरानेच न्यायाधीश बनून स्वत:ला निर्दोष घोषित करण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न म्हणा. तिकडे उत्तर प्रदेशात कॉंग्रेसवाले निवडणूक आयोगाला धाब्यावर बसवीत मुसलमानांना सवलतींचा शिरकुर्मा खाऊ घालीत आहेत तर इकडे महाराष्ट्रात निवडणूक आयोगाला ‘अंधारात’ ठेवत थैल्यांचे राजकारण करीत आहेत. अमरावतीत जप्त केलेली रक्कम पक्षनिधीची होती तर तसे पत्र पोलिसांना देण्यासाठी कॉंग्रेसवाल्यांना बारा तासांचा ‘पंजा’लढाव का करावा लागला? प्रदेश कॉंग्रेसकडून ऐनवेळी तसे पत्र का पाठवले गेले? हेच पत्र पैशासोबत का नव्हते? ज्या गाडीतून ही रक्कम जप्त केली गेली ती गाडी मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या जवळ होती अशी जी कुजबूज सुरू आहे तिचा अर्थ काय घ्यायचा? या गाडीतून कॉंग्रेसचा कोणता नेता नागपूरला गेला आणि परत येताना त्यात एक कोटींचा ‘पक्ष निधी’ कसा आला? तो कुणी, कुणासाठी दिला? ज्या राज्यमंत्र्याचे नाव यासंदर्भात घेण्यात येत आहे त्याची या प्रकरणात नेमकी भूमिका काय, असे अनेक प्रश्‍न अमरावतीच्या थैलीकांडाने उपस्थित केले आहेत. अर्थात कॉंग्रेसवाल्यांचा अनुभव पाहता यापैकी एकाही प्रश्‍नाचे उत्तर मिळण्याची शक्यता कमीच. पक्ष निधीचा मुलामा ज्या पद्धतीने आता दिला जात आहे त्या रंगसफेदीचा अर्थही तोच आहे. प्रकरणाला एकीकडे बगल द्यायची आणि त्याचवेळी सरकारी कोषागारात जमा केली गेलेली रक्कम पुन्हा परत मिळण्याच्या दृष्टीने पळवाट मोकळी ठेवायची, असा हा अट्टल कॉंग्रेजी प्रयत्न आहे. गेल्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुकीत महाराष्ट्रात मतदान यंत्रांचा घोटाळा याच सत्ताधारी मंडळींनी केल्याचे उघड झाले होते. उत्तर प्रदेशात कॉंग्रेसवाले मुस्लिम मतांचा घोटाळा जोरशोर से करीत आहेत. त्यासाठी घटनेची चौकट, देशाची एकता, अखंडतेला खुलेआम सुरुंग लावले जात आहेत. थोडक्यात सत्तेत येण्यासाठी कुठे मतदान यंत्रांचा, कुठे सवलतींचा तर कुठे थैल्यांचा घोटाळा करायचा आणि सत्तेत आल्यावर आदर्श, राष्ट्रकुल, २ जी स्पेक्ट्रम असे महाघोटाळे करायचे. पुन्हा हे सर्व तुमच्या त्या लोकशाहीच्या नावानेच होत असते. अशा बाबतीत कॉंग्रेसवाल्यांइतके गेंड्याच्या कातडीचे आणि निर्लज्ज दुसरे कोणी नाहीत. अमरावतीमधील गैरप्रकाराने त्या गेंड्याची कातडीही थरथरली असेल, पण कॉंग्रेसवाल्यांची ना कातडी थरथरली ना शरमेने मान खाली झुकली. स्वत:ची मान ताठ ठेवायची आणि देशाची खाली झुकवायची हेच कॉंग्रेसवाल्यांचे धोरण आहे. मुळात प्रश्‍न आहे तो अशा प्रकरणात होणार्‍या कारवाईचा. मध्यंतरी पालिका निवडणुकीच्या वेळी नांदेड जिल्ह्यातही कॉंग्रेसचा 
‘अमरावती पॅटर्न’ उघड झाला होता. पोलिसांनी गुन्हादेखील नोंदविला होता. मात्र पुढे त्या गुन्ह्याचे लोणचे कुठल्या बरणीत घातले गेले काहीच कळले नाही. उत्तर प्रदेशात अलीकडेच या पद्धतीने सुमारे ४२ कोटी रुपये जप्त केले गेले. तामीळनाडू विधानसभा निवडणुकीच्या वेळीही अशा गैरप्रकारांबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर आयोगाने रिझर्व्ह बँकेला निवडणूक काळात बँकांमधून काढण्यात येणार्‍या पैशांबाबत ‘नजर’ ठेवण्यासंबंधी सूचना करणारे पत्र लिहिले होते. एवढेच नव्हे तर ज्या पाच राज्यांत विधानसभा निवडणूक होत आहे तेथे अडीच लाखांपेक्षा जास्त रुपयांची तपासणीशिवाय ने-आण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्राला हा निर्णय कदाचित लागू नसावा म्हणून तर अमरावतीत एक कोटी रुपये मध्यरात्री नेले जात होते. आजवर अशाप्रकारचे अनेक गुन्हे पकडले गेले आहेत. तेवढ्यापुरत्या बातम्या येतात. तेवढीच खळबळ उडते. पुढे त्या प्रकरणांचे, त्या पैशांचे काय होते, निवडणूक आयोगाच्या आसुडाचे वळ कुणावर उठले की उठलेच नाहीत या सर्वच गोष्टी गुलदस्त्यात राहतात. आमच्या देशात जेथे दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटांचे सूत्रधार कधीच सापडत नाहीत तेथे या ‘थैली बॉम्ब’चे सूत्रधार सापडतील अशी अपेक्षा करणे व्यर्थच आहे. शेवटी सरकार त्यांचे, शासकीय यंत्रणाही त्यांच्याच नियंत्रणाखाली. निवडणुकीत काळ्या पैशांचा होणारा वापर, केला जाणारा पैशांचा खेळ यावर चर्चा सगळेच करतात. ज्या यंत्रणांनी या गैरप्रकारांना आळा घालायचा त्या यंत्रणाही या चर्चेत सहभागी होतात. काही उपायदेखील योजले जातात. तरीही निवडणूक जिंकण्याचा कॉंग्रेसचा ‘अमरावती पॅटर्न’ कमी होत नाहीच. काही महिन्यांपूर्वी पालिका निवडणुकीत कॉंग्रेस आघाडीकडून पैशांचा वापर झाल्याचे दिसून आलेच होते. आता महापालिका निवडणुकीतही तोच खेळ ही मंडळी जोरात खेळत आहेत. ठिकठिकाणी ‘थैली बॉम्ब’ पेरत आहेत. एक थैली बॉम्ब फुटला, इतर फुटलेले नाहीत इतकेच. मात्र या संपूर्ण गैरप्रकारात तुमची ती लाडकी लोकशाही तुम्हीच ‘डिफ्यूज’ करीत आहात त्याचे काय? 
Share this Article on :
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
 

© Copyright संपादकीय अग्रलेख 2010 -2011 | Design by Herdiansyah Hamzah | Published by Borneo Templates | Powered by Blogger.com.