News Update :

सायकलिंग पास, इंजिनिअरिंग फेल

Tuesday, March 6, 2012



जाती एकत्र करून सत्ता मिळवण्याचा सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला कोलमडला. यातून मतदारांनी दिलेला इशारा समजून घेतला पाहिजे. 

राजकारणात सोशल इंजिनिअरिंग नावाची मते मिळवणारी नवी झटपट विद्याशाखा सुरू करून उत्तर प्रदेशात सत्तेवर आलेल्या मायावतींवर अखेर जणू ही विद्याशाखा उलटली. या विद्याशाखेत नवी प्रतीके तयार झाली. हत्तीला गणेशाचे स्थान मिळाले. "बहुजन हिताय - बहुजन सुखाय'च्या जागी "सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय' आले. बम्मन-बनिया यांना चोरांच्या जागी ठेवले होते, ते मित्रांच्या जागी आले. या सर्वांच्या जोरावर मायाबहन यांनी एकहाती मिळवलेली सत्ता आता समाजवादी पक्षाकडे एकहातीच निघाली आहे. उत्तर प्रदेशभर उभारलेले हत्ती चालू शकले नाहीत; जागच्या जागीच राहिले आणि या सर्वांना मागे टाकत सायकल पुढे गेली. सोशल इंजिनिअरिंगचा धसका दिल्लीपासून गल्लीपर्यंत मी-मी म्हणवणाऱ्यांनी घेतला होता. लखनौतून हत्ती सुटतील आणि आपल्या शेतात भरलेल्या पिकाची नासाडी करतील, अशी भीती रथी-महारथींना वाटत होती. "अछूत की बेटी कुछ भी कर सकती है', असा दरारा मायावतींनी निर्माण केला होता; पण हत्ती लखनौतून हलला नाही. हे असे का झाले आणि हत्तीच्या जागी सायकल का आली, हा महत्त्वाचा प्रश्‍न असणार आहे. समाजवादी पक्ष सर्वांत मोठा पक्ष ठरेल आणि त्याला कॉंग्रेस किंवा भाजपच्या मदतीने सिंहासन उभे करावे लागणार, अशी भाकिते केली जात होती, तीही खोटी ठरली. विशेष म्हणजे 2007 च्या निवडणुकीत अशीच भाकिते मायावतींबाबत केली गेली होती आणि तीही खोटी ठरली होती. मतदारराज भाकितांच्या चौकटीत मावत नाही, हेही पुन्हा पुन्हा सिद्ध होत असले, तरी मायाराज असे पहिल्याच टर्मनंतर का कोसळले, इंजिनिअरिंगचा नवा फॉर्म्युला ढिल्ला का झाला, या फॉर्म्युल्यातून मुस्लिम, ब्राह्मण बाहेर का पडले, याचा शोध घ्यावा लागणार आहे. मायावती सत्तेवर आल्या, त्या दलितांच्या मसीहा बनून; पण त्यांना फॉर्म्युला चालविताना एककल्ली भूमिका घेऊन चालणार नव्हते. सत्तेचे पत्ते हातात आल्यानंतर स्वाभाविकपणे त्या दलितांकडे झुकू लागल्या; पण हे झुकणे दलितांचा उद्धार किंवा विकास करणारे नव्हते. राज्यभर स्वत:चे आणि हत्तीचे पुतळे उभे करण्याला त्या विकास समजू लागल्या. दलित, मुस्लिम आणि ब्राह्मण अशी मोट बांधली खरी; पण ती हाकणे कठीण होते. मुलायमसिंह यांच्या सरकारला गुंडाराज ठरवत त्या स्वत:च्या सरकारमध्ये आणि पक्षामध्ये या ना त्या पद्धतीने गुंडाराज पोसण्याचा प्रयत्न करू लागल्या. सत्ता टिकवण्यासाठी जाती लागतात, गुंड लागतात, आक्रमक मनगटे लागतात, थैल्या लागतात आणि इमेज बिल्डिंगसाठी पुतळेही लागतात, असा नवा उपफॉर्म्युला तयार झाला. त्यातून मायावतींचे हुकूमशहात रूपांतर झाले. आपल्या प्रभावामुळे अनेकांना सत्ता मिळाली आहे. त्यामुळे हे सारे जण आपल्या सिंहासनाभोवती टाकलेले तुकडे चघळत राहतील, असेही त्यांना वाटू लागले. गुंडाराज संपविण्याची भाषा करणाऱ्या मायावतींच्या राज्यात सत्तेने स्पॉन्सर केलेली गुंडगिरी वाढली. आमदार, पुढारी आदी कारभारीच बलात्कार, लूट आणि अपहरण यांसारख्या गुन्ह्यांत अडकू लागले. दलितांवरील अन्याय वाढले. ते कमी करण्यासाठी मायावतींनी काही कायदे केले. त्याचा वापर करून आणि ऍट्रासिटीचे हत्यार वापरून सवर्णांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची जणू साथच आली. शेकडो, हजारो गुन्हे अशा प्रकारे दाखल झाले आहेत. इंजिनिअरिंगमध्ये असणाऱ्या सर्वच घटकांना सत्ता देता येत नव्हती. सर्वांचेच समाधान करता येत नव्हते. ऍट्रासिटीच्या केसेसही थांबवता येत नव्हत्या. यातून एक धुम्मस सुरू झाली. ब्राह्मण बिथरला आणि मुस्लिमही बिथरला. राज्याचा विकास केवळ कल्पनेत होता. घोषणा वाऱ्यावर उडून जात होत्या आणि सत्ताधारी मात्र नव्या सरंजामदाराप्रमाणे जगत होते. काही जण लाल दिव्याचा वापर गुंडगिरीसाठी करत राहिले. मायाराज खरोखरच मायाबाजारप्रमाणे ठरू लागले. प्रतिमा बचावसाठी मायावतींनी मग मंत्र्यांना बडतर्फ करण्याचा सपाटा सुरू केला. त्यातून व्यक्ती आणि समाज नाराज होऊ लागले. इंजिनिअरिंगमधील एक-एक स्क्रू ढिला होऊ लागला. निवडणूक निकालानंतर राजकारणाचे नवे मॉडेल कुचकामी ठरले. 

उत्तर प्रदेश देशाच्या राजकारणात महत्त्वाचे राज्य आहे, ते ताब्यात ठेवण्यासाठी कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी तळ ठोकला. झोपडपट्ट्यांचे दर्शन घेतले. उत्तर प्रदेशला आधुनिक राज्य बनविण्याचे स्वप्न ठेवले; पण त्याचा काही उपयोग झाला नाही. कॉंग्रेसच्या जागांमध्ये जेमतेम डझनभराने वाढ झाली. राजकारणातील एक मोठी लढाई राजकुमार हरला असला तरी त्याचा पराभवच विजयासारखा कसा आहे, हे सांगण्याची शर्यत दिल्ली दरबारातील झिलकऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. विशेष म्हणजे युवराजाने स्वत: पराभव स्वीकारला असला तरी झिलकरी मात्र "पराभव' हा शब्द उच्चारण्यास तयार नाहीत. भाजपनेही आपले तरुण अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढविली. साध्वी उमा भारतींच्या हातात निवडणूक सूत्रे दिली. भ्रष्टाचाराचा महामेरू असलेल्या आणि मायावतींनी मंत्रिमंडळातून लाथाडलेल्या बाबूसिंह कुशावाह यांनाही वाजतगाजत आपल्या पक्षात घेतले. स्टार प्रचारकाप्रमाणे त्यांना फिरवण्यास सुरवात केली. शेवटी जननिंदेला जागून बाबूसिंह यांनीच आपला भाजप प्रवेश रद्द करून घेतला. हे सारे कमी होते म्हणून की काय, म्हणून गेली काही वर्षे म्यान केलेले राममंदिराचे हत्यारही बाहेर काढले. मायावतींपासून तुटला गेलेला ब्राह्मण साराच्या सारा आपल्याकडे येईल, असे स्वप्न पाहिले; पण या साऱ्या स्वप्नांवर सायकलीने गाडगाभर पाणी ओतले. 2007 मध्ये भाजपला 48 जागा जिंकता आल्या होत्या. आता त्यात दोन-चार जागांनी वाढ झाली, हीच काय ती गडकऱ्यांची कमाई. मुलायमसिंह यांचे पुत्र अखिलेश यादव यांनी सारी निवडणूक फिरवून दाखविली. युवराजांनाही त्यांची जागा दाखविली. 403 जागा असलेल्या उत्तर प्रदेशात इतरांच्या मदतीने जेमतेम पन्नासएक जागा जिंकणे, ही कॉंग्रेसची नाचक्कीच म्हणावी लागेल; पण पडलो तरी नाकावर, म्हणणाऱ्या कॉंग्रेसने मात्र आपण 22 वरून 44 वर कसे आलो, हे सांगण्यात धन्यता मानायला सुरवात केली आहे. मुलायमसिंह यांच्या मुलाने आपल्या पक्षाचा चेहरामोहराच बदलला. त्याला तरुण केले. सर्वजातीय केले. सामान्य जनतेला भावेल असा अजेंडा तयार केला. त्यामुळेच की काय, लोकांनी मायावतींच्या विरोधात समाजवादी पक्षाला पर्याय समजण्यास सुरवात केली. बाकी सर्व पक्षांवर लोकांनी विश्‍वास टाकला नाही. अनेक वर्षे राजकीय गटांगळ्या खाणाऱ्या आपल्या राज्याला त्रिशंकू न ठेवता स्वबळावर सरकार स्थापन करता येईल एवढे यश दिले आहे. 2007 नंतर सलग दुसऱ्यांदा असे घडते आहे. याचा अर्थ मायावतींनी समजून घेतला नाही. मुलायमसिंह तरी तो समजून घेणार का, हा प्रश्‍न आहे. राजकारण पूर्वी विचारावर चालायचे, आता त्याची जागा जातीने घेतली आहे. जाती एकत्र करता येतात; पण प्रत्येकाचा जातीअभिनिवेश, अहंकार, सर्व प्रकारचा स्वार्थ टिकून ठेवणे, तो गोंजारणे तसे कठीण असते. हाही सोशल इंजिनिअरिंगचा एक बायप्रॉडक्‍ट आहे. मुलायमसिंहसुद्धा हाच प्रयोग करणार आहेत. त्यांना तो करावा लागणार आहे. भारतीय जातवास्तव नाकारता जसे येत नाही, तसे मधाचे बोट दाखवून ते फार काळ एकत्रही ठेवता येत नाही; पण सत्तेमुळे आंधळे झालेल्या आणि जातीलाच राजकारण समजणाऱ्यांना हे कोण सांगेल? 

उत्तर प्रदेशबरोबरच गोवा, मणिपूर, पंजाब आणि उत्तराखंड या अन्य छोट्या राज्यांतही निवडणुका झाल्या. गोव्यात कॉंग्रेसची धोबीपछाड झाली आणि राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. भाजपने मित्राच्या मदतीने येथे चमकदार कामगिरी केली आहे. कर्नाटकात अश्‍लील भानगडी उघडकीस आल्यानंतरही भाजपला हे यश मिळाले. पंजाबातही अकाली दलाच्या मदतीने भाजप पुन्हा सत्तेत जाणार आहे. कॉंग्रेसने तेथे लज्जारक्षणापुरते यश मिळविले, ही चांगली गोष्ट. याशिवाय छोटे मणिपूर आपल्या हातात ठेवण्यात कॉंग्रेसने यश मिळविले आहे. उत्तराखंड भाजपच्या किल्ल्यासारखे होते; पण तेही खिळखिळे होते आहे. तेथे कॉंग्रेसला एक जागा अधिक मिळाली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांचीच विकेट पडली आहे. उत्तराखंडात सत्तासंघर्ष नेमके कोणते वळण घेतो हे लवकरच स्पष्ट होईल. पाचही राज्यांमध्ये निवडणूक काळात विकासाऐवजी धुणीभांडी धुण्याचाच कार्यक्रम झाला. लोकशाहीसाठी हे चांगले लक्षण म्हणता येणार नाही. 

Tags: editorial, uttar pradesh, assembly election, mayawati, sp, congress, national http://online2.esakal.com/esakal/20120307/5017657648281555872.htm
Share this Article on :
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
 

© Copyright संपादकीय अग्रलेख 2010 -2011 | Design by Herdiansyah Hamzah | Published by Borneo Templates | Powered by Blogger.com.